मस्सा जोगचे संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. मुख्यमंत्री यांनी राजीनामा स्वीकारला असून, पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालाकडे पाठविण्यात येणार असल्याचे माध्यमाशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले.
सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मुंडे यांचे पीए, ओएसडी यांनी ‘सागर’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला.
”धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. मुंडे यांचा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांना मंत्रिपदाच्या कार्यभारातून मुक्त केले आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विविध भ्रष्टाचार प्रकरणात आरोप झालेले धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. धनंजय मुंडे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता. मात्र, मुंडेंनी राजीनामा न दिल्याने त्यांचा दावा फोल ठरला होता. त्यानंतर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून तो दोन तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असा नवा दावा केला होता. अखेर आज मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे पहा…
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.