धारूर — शेतकऱ्यांचा आक्रोश वाढतोय, पण प्रशासन मात्र कानावर हात!
किल्ले धारूर (मनोज जगताप)
किल्ले धारूर परिसरातील शेतकऱ्यांना मागील एक वर्षापासून वीजपुरवठ्याच्या तासात होत असलेल्या वारंवार ट्रिपिंगमुळे प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. क्रेशरवाल्यांकडील जास्तीलोड व अवैधपणे चालणाऱ्या मशिनरीमुळे पूर्ण लाईनवर ताण वाढत असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे, असा आरोप शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
अधिकारी बेफिकीर, नियंत्रण शून्य!
अधिकारी बेफिकीर, नियंत्रण शून्य!

संबंधित उपकार्यकारी अभियंत्यांचे धारूर उपकेंद्रावरील नियंत्रण जवळपास नाहीच असे चित्र आहे.
ते धारूरमध्ये न राहता केज येथे राहतात, त्यामुळे आकस्मिक परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणीच उपलब्ध नसते.
धारूर कार्यालयातील वाहन हे कार्यालया बाहेर इतरत्रच फिरताना दिसते, असा शेतकऱ्यांचा आरोप.
कार्यालयाचा फोन लावला की कर्मचारी उचलत नाहीत; उलट उचलले तर उद्धट भाषा, “प्रायव्हेट नंबर वर कॉल करा” असे बोलणे — परंतु क्रेशरवाल्यांचे फोन मात्र पहिल्याच रिंगमध्ये उचलले जातात, अशी मोठी तक्रार आहे.
दर 5-10 मिनिटांनी लाईट ट्रिप — शेतकरी रात्रभर जागे!
धारूर एजी फीडरवर सप्लायची वेळ सकाळी 6 ते दुपारी 2 अशी ठरलेली असताना —
प्रत्यक्षात लाईट 7 नंतरच सुरू केली जाते.
8 ते 9 या वेळात मुद्दाम बंद ठेवली जाते — “लोड बसत नाही” हे कारण देत.
उरलेल्या वेळातही 15-20 मिनिटांनी लाईट बंद केली जाते.
अशा परिस्थितीत 8 तासांपैकी केवळ 4 ते 4.5 तासच वीजपुरवठा मिळतो. पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागून राहावे लागत असून आरोग्यावर गंभीर परिणाम, तसेच पिकाचा धोका वाढला आहे.
शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही!
प्रशासनाकडे पुन्हा पुन्हा तक्रारी करूनही काहीच सुधारणा होत नसल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहेत. क्रेशरवाल्यांना प्राधान्य, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष — अशी भावना शेतकरी बांधवांत निर्माण झाली असून लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत






